नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी, बिहार मतदार पडताळणीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी संसदेच्या आवारात निदर्शने केली. विरोधी पक्षाच्या खासदारांनी गांधी पुतळ्यापासून मकरद्वारपर्यंत (नवीन संसद इमारतीचे प्रवेशद्वार) मोर्चा काढला. मकरद्वार येथे पोहोचताच, राहुल-प्रियंका यांच्यासह विरोधी खासदारांनी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) लिहिलेले पोस्टर्स फाडले व ते प्रतीकात्मक कचऱ्याच्या डब्यात फेकले. त्यांनी मोदी सरकार हटावच्या घोषणाही दिल्या.
दरम्यान, लोकसभेतही विरोधकांनी घोषणाबाजी केली. भागृहातील कामकाज फक्त २० मिनिटे चालले. सभापती ओम बिर्ला यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. २८ जुलैपासून सभागृहाचे कामकाज सुरळीत चालविण्याबाबत एकमत झाले आहे. त्याच दिवशी ‘ऑपरेशन सिंदूर’वरही चर्चा होणार आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह खासदार प्रियंका गांधी-वढेरा आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आंदोलनात सहभागी झाले होते. खर्गे म्हणाले की, केंद्र सरकार गरीबांना त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवू इच्छितात आणि फक्त उच्चभ्रू वर्गाला मतदान करू देऊ इच्छितात, केंद्र सरकार संविधानाचे पालन करत नाही. ‘एसआयआर’विरुद्धचा आमचा लढा सुरूच राहील.