पाकिस्तानसारख्या बेजबाबदार राष्ट्राच्या ताब्यात अण्वस्त्र असणे अत्यंत धोकादायक आहे, त्यामुळे ही अण्वस्त्रे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी ( International Atomic Energy Agency- IAEA) च्या देखरेखीखाली आणली पाहिजेत, अशी मोठी मागणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गुरूवारी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच पाकिस्तानच्या "न्यूक्लियर ब्लॅकमेल" विरोधात उघड भूमिका घेत, दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिल्यानंतर काही दिवसांतच राजनाथ सिंह यांचे हे विधान आले आहे.
न्यूक्लियर ब्लॅकमेलकडेही दुर्लक्ष
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर राजनाथ सिंग पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी जवानांशी संवाद साधला. भारताने पाकिस्तानच्या आण्विक ब्लॅकमेलकडेही लक्ष दिले नाही, यावरुनच दहशतवादाविरुद्ध भारताचा दृढनिश्चय किती मजबूत आहे याचा अंदाज लावता येतो, असे ते म्हणाले.
पाकची अण्वस्त्रे IAEA च्या देखरेखीखाली आणा
पाकिस्तानने किती बेजबाबदारपणे भारताला अनेक वेळा अणुहल्ल्याची धमकी दिली, हे जगाने पाहिलंय. अशा बेजबाबदार राष्ट्राच्या हातात अण्वस्त्रे सुरक्षित आहेत का? हा प्रश्न मी आज जगाला विचारतो. पाकिस्तानची अण्वस्त्रे IAEA च्या देखरेखीखाली आणली पाहिजेत असे माझे ठाम मत आहे, असे ते म्हणाले.
भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी दहशतवादविरोधी कारवाई
“गेल्या ३५-४० वर्षांपासून भारत सीमापार दहशतवादाचा सामना करतोय. पण, दहशतवाद्यांविरोधात कारवाईसाठी आम्ही कुठल्याही टोकाला जाऊ शकतो हे भारताने आज जगाला दाखवून दिले आहे. यावेळी त्यांनी, भारताच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी दहशतवादविरोधी कारवाई म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’ असेही म्हटले.
त्यांचा मस्तकावर घाव, आपला थेट छातीत वार
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करून भारताच्या मस्तकावर घाव करण्याचा आणि देशाची सामाजिक एकता तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी भारताच्या मस्तकावर घाव करण्याचा प्रयत्न केला, पण आपण त्यांच्या छातीवरच वार केला.
पाक उभा राहतो तिथून भिकाऱ्यांची रांग लागते
“पाकिस्तानची अवस्था अशी झाली आहे की जिथे तो उभा असतो तिथून भिकाऱ्यांची रांग लागते. अलीकडेच कर्ज मागण्यासाठी ते आयएमएफकडे विनवणी करत होते. दुसरीकडे, भारत असा देश आहे जो गरीब देशांची मदत करता यावी म्हणून आयएमएफलाच कर्ज देतो."
राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला की, “भारतीय भूमीवरचा कुठलाही दहशतवादी हल्ला आता ‘युद्ध’ मानला जाईल.” त्यांनी स्पष्ट केले, “दहशतवाद आणि चर्चा एकत्र शक्य नाहीत. चर्चा झालीच, तर ती फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवरच होईल.”
दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांमध्ये निर्माण झालेल्या संतापाचा उल्लेख करत ते म्हणाले, “मला माहीत आहे की पहलगामच्या घटनेनंतर तुमच्यात प्रचंड संताप होता. पण तुम्ही तुमच्या संतापाला योग्य दिशा दिलीत आणि धैर्याने त्याचा बदला घेतलात, याचा मला अभिमान आहे.”
ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी सैन्याला धूळ चारणाऱ्या भारतीय जवानांच त्यांनी भरभरुन कौतुक केलं.