महागाईबाबत आरबीआय सतर्क;आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे प्रतिपादन

महागाई आटोक्यात आणण्याबाबत अडचणी निर्माण होत आहेत, असे त्यांनी सांगितले
महागाईबाबत आरबीआय सतर्क;आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : महागाईच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रभावाबाबत आरबीआय एकदम सतर्क आहे, असे प्रतिपादन आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.

ते म्हणाले की, भाज्यांच्या किमती वाढल्याने जुलैमध्ये महागाईचा दर ७.४४ टक्के वाढला होता. आता भाज्यांच्या किमती कमी होत आहेत. महागाई ४ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे प्रयत्न आरबीआय करत आहे. जेव्हा महागाई कमी होती. तेव्हा कुटुंब व उद्योगांना दीर्घकालीन बचत व गुंतवणुकीच्या योजना बनवण्यासाठी मदत मिळाली. आता जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे महागाई आटोक्यात आणण्याबाबत अडचणी निर्माण होत आहेत, असे त्यांनी सांगितले.

आरबीआयच्या पतधोरणाबाबत ते म्हणाले की, खड्डे व स्पीडब्रेकर असलेल्या रस्त्यावरून गाडी चालवणे जितके कठीण असते त्याचप्रमाणे पतधोरणाचे संचालन कठीण असते. पतधोरण हे भविष्याला पाहून तयार केले पाहिजे. पाठी बघून हे धोरण बनवल्यास त्यातील त्रुटीचा धोका कायम राहील. महागाईला आळा घालण्यासाठी मे २०२२ नंतर आरबीआयने रेपो दरात २५० बेसिस पॉइंटची वाढ केली. भारताच्या बँकिंग क्षेत्रात भांडवली पर्याप्तता सुधारणा, मालमत्ता दर्जा, नफा वाढल्याने ते मजबूत बनले आहे.

logo
marathi.freepressjournal.in