सलग दुसऱ्यांदा आरबीआयचा रेपो दर न वाढवण्याचा निर्णय; गव्हर्नर शक्तिकांत दास यांची घोषणा

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असून महागाई दरात घट झाल्याचं सांगितलं आहे.
सलग दुसऱ्यांदा आरबीआयचा रेपो दर न वाढवण्याचा निर्णय; गव्हर्नर शक्तिकांत दास यांची घोषणा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आपल्या रेपोरेटमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेत कर्जदारांना दिलासा दिला आहे. आरबीआयनं रेपो रेटमध्ये कोणतीही वाढ न केल्यानं तो 6.50 टक्क्यांवर कायम राहणार आहे. यामुळं व्याजदरात कोणताही बदल न होता ते जैसे थे राहणार आहेत. तसंच आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असून महागाई दरात घट झाल्याचं सांगितलं आहे.

आरबीआयनं आज पतधोरण जाहीर केलं आहे. यावेळी आरबीआयच्या पतधोरण समितीने सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कोणतेही बदल न करता रेपो रेट 6.50 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयनं मागील वर्षी रेपो दरात 2.50 टक्क्यांनी वाढ केली होती. एप्रिल महिन्यातील महागाई दर 4.7 टक्के होता, जो मागील वर्षातला सर्वात कमी आहे. चालू आर्थिक वर्षात महागाई दर 5.1 टक्के राहण्याची शक्यता आहे.

रेपो रेट आणि व्याजदर यांचा थेट संबंध येतो. रेपो रेट कमी असल्यावर कर्जावरील व्याज कमी होतं आणि रेपो रेट वाढल्यावर कर्जावरील व्याज वाढतं. याचा परिणाम ऑटो लोन, होम लोन, पर्सनल लोन अशा सर्व कर्जांवर होतो. रिझर्व्ह बॅंक इतर बँकांना ज्या दरावर कर्ज देते त्याला रेपो रेट म्हणतात. तसंच ज्या पैशांच्या ठेवींवर रिझर्व्ह बँक व्याज देते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. रेपो दर कमी झाल्यानं कर्जाचा ईएमआय कमी होतो, तर रेपो दरात वाढ झाल्यानं सर्व कर्ज महाग होतात. त्यामुळे ईएमआयमध्येही वाढ होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in