
नवी दिल्ली : किरकोळ महागाई दर डिसेंबरमध्ये ५.२२ टक्क्यांवर घसरला असून गेल्या चार महिन्यांतील ही नीचांकी पातळी असल्याने सरकारला दिलासा मिळाला आहे. मुख्यत: भाज्यांसह खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई दर घसरल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीतून दिसून आले. दरम्यान, किरकोळ महागाईत घसरण झाल्याने रिझर्व्ह बँकेच्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पतधोरण आढावा बैठकीत प्रमुख व्याजदरात कपात करण्यास वाव आहे.
सलग दुसऱ्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) ६ टक्क्यां दिलासादायक पातळीखाली ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर आहे. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ५.४८ टक्के होता आणि वर्षभरापूर्वी ५.६९ टक्के होता.
डिसेंबर २०२४ मध्ये, भाजीपाला, डाळी आणि उत्पादने, साखर, मिठाई, पर्सनल केअर उत्पादने आणि तृणधान्ये आणि उत्पादनांच्या किमतीत लक्षणीय घट दिसून आली, असे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ)ने किरकोळ महागाई दर जारी करताना म्हटले.
डिसेंबर २०२४ मध्ये सर्वाधिक महाग असणारे शीर्ष पाच पदार्थ म्हणजे वाटाणे (८९.१२ टक्के), बटाटा (६८.२३ टक्के), लसूण (५८.१७ टक्के), खोबरेल तेल (४५.४१ टक्के) आणि फुलकोबी (३९.४२ टक्के) आहेत. डिसेंबरमध्ये जीरा, आले, कोरडी मिरची आणि एलपीजी (वाहतूक वगळता) या प्रमुख वस्तू तुलनेने स्वस्त झाल्या. अन्न विभागातील महागाई डिसेंबरमध्ये ८.३९ टक्के होती, जी मागील महिन्यात ९.०४ टक्के आणि डिसेंबर २०२३ मध्ये ९.५३ टक्के होती.