
नवी दिल्ली : शालेय अभ्यासक्रमाचे भगवेकरण केल्याच्या आरोपाचा एनसीईआरटीचे अध्यक्ष दिनेश प्रसाद सकलानी यांनी सपशेल इन्कार केला आहे. शालेय अभ्यासक्रमात गुजरातमधील दंगली आणि बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आलेल्या घटनांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत कारण दंगलींबाबतचे शिक्षण दिल्याने हिंसक आणि नैराश्याने ग्रासलेला नागरिक तयार होऊ शकतो, असे सकलानी यांनी म्हटले आहे.
क्रमिक पुस्तकांमधील बदल हा वार्षिक उजळणीचा एक भाग असून त्यावरून एवढा गहजब होऊ नये. शालेय क्रमिक पुस्तकांमधनू गुजरात दंगलींचे धडे का द्यावेत, आपल्याला सकारात्मक नागरिक घडवायचे आहेत, हिंसक आणि नैराश्याने ग्रासलेले नाही, असे सकलानी म्हणाले. वृत्तसंस्थेच्या संपादकांशी शनिवारी त्यांनी येथील मुख्यालयात संवाद साधला.समाजामध्ये तिरस्कार निर्माण व्हावा किंवा तिरस्काराचे ते बळी ठरावे असे शिक्षण आपण विदद्यार्थ्यांना देणार आहोत का, हा शिक्षणाचा उद्देश आहे का, लहान मुले मोठी होत असताना आपण त्यांना दंगलींचे शिक्षण देणार का, त्यांना त्याची माहिती होईलच पण ती क्रमिक पुस्तकातून द्यावी का, ते मोठे होतील तेव्हा त्यांना ते का आणि कसे घडले याची माहिती कळेलच, बदलांबाबतचा गहजब निरर्थक आहे, असेही सकलानी म्हणाले.
बदल आणि काही भाग वगळून नवी क्रमिक पुस्तके बाजारपेठेत आल्यानंतर सकलानी यांनी वरील भाष्य केले आहे. इयत्ता १२वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये बाबरी मशीद असा उल्लेख नाही तर तीन घुमटांचे बांधकाम असा उल्लेख करण्यात आला आहे. तर अयोध्येवर चार ऐवजी दोनच पाने समाविष्ट करण्यात आली आहेत. आपल्याला सकारात्मक नागरिक घडवायचे आहेत आणि तोच क्रमिक पुस्तकांचा उद्देश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.