

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, 'ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशन'ने (एआयडीए) पेट्रोलमध्ये २० टक्क्यांहून अधिक इथेनॉल मिश्रण पुरवण्याची तयारी दर्शवली आहे.
या निर्णयामुळे भारताचे आयात केलेल्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व प्रमाणात कमी होऊ शकेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्च वाढू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात, एआयडीएच्या उपमहासंचालिका भारती बालाजी यांनी नमूद केले की, देशाने यापूर्वीच गाठलेल्या 'ई२०' (२० टक्के इथेनॉल मिश्रण) या उद्दिष्टाच्याही पुढे जाण्यास इथेनॉल उद्योग सज्ज आहे.
सध्या मध्य-पूर्व आशिया युद्धजन्य परिस्थितीत अडकलेला असताना आणि तेलाच्या किमती वाढू लागल्या असताना, इथेनॉल उद्योग म्हणून आम्ही २० टक्क्यांहून अधिक इथेनॉल पुरवण्यास तयार आहोत. यामुळे कच्च्या तेलाच्या आयातीत मोठ्या प्रमाणात कपात होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
इथेनॉल उत्पादन क्षमता २,००० कोटी लिटर
भारताच्या इथेनॉल क्षेत्राची एकूण उत्पादन क्षमता आता २,००० कोटी लिटर झाली आहे. सध्या ३८० हून अधिक विशेष इथेनॉल निर्मिती प्रकल्प कार्यरत आहेत. तर आणखी ३३ प्रकल्प उभारणीच्या प्रक्रियेत आहेत.