रोहित पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट; अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर केली चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूवर चर्चा केली.
रोहित पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट; अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर केली चर्चा
रोहित पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट; अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर केली चर्चा Photo : X (Rohit Pawar)
Published on

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूवर चर्चा केली. रोहित यांनी यावेळी काँग्रेस नेते पी चिदंबरम व दिग्विजय सिंहांसारख्या इतरही काही काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. यावेळी या नेत्यांनी या दुर्घटनेवर तीव्र चिंता व्यक्त करत अजित पवारांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून सत्ताधारी व विरोधी बाकावरील काही आमदारांनी हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. विशेषतः आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी वेळोवेळी पत्रकार परिषदा व प्रझेन्टेशन करून हा घातपातच असल्याचा आरोप केला आहे. सध्या ते दिल्लीत वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना हा विषय समजावून सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचीही भेट घेऊन त्यांना हा विषय समाजवून सांगितला.

रोहित काय म्हणाले

रोहित पवार यांनी एका ट्विटद्वारे या भेटीविषयी सांगितले की, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत दिल्लीत काही खासदारांना भेटून चर्चा करत असताना त्यावेळी सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचीही भेट झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनाही भेटून अजितदादांच्या संशयास्पद विमान अपघाताचा विषय थोडक्यात समजून सांगितला. या दुर्घटनेबाबत या सर्व नेत्यांनी चिंता व्यक्त केली. अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी ही सर्व नेते मंडळी नक्कीच सहकार्य करतील, असा विश्वास आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

तत्परता का नाही

रोहित पवारांनी यावेळी सरकारवर अजितदादांच्या विषयात तत्परता दाखवत नसल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, राज्य व केंद्र सरकार एकाच विचाराचे डबल इंजिन सरकार असेल तर राज्य सरकारने पाठवलेले प्रस्ताव केंद्र सरकार लगेच मान्य करते असे वाटत होते. पण अजित दादांसारख्या लोकनेत्याच्या अपघाताच्या सीबीआय चौकशीची राज्य सरकारने मागणी करूनही केंद्र सरकार दखल घेत नाही, कुठेतरी मनाला पटणारे नाही. सुशांत सिंह आत्महत्येच्या प्रकरणात बिहार सरकारने विनंती केल्यावर दोनच दिवसात केंद्राने सीबीआय चौकशी सुरू केली होती, तीच तत्परता अजित दादांच्या विषयात का नाही, असा सवाल त्यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in