नवी दिल्ली : सहारा समूहाकडून आणखी निधी मिळविण्यासाठी सरकार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. कारण तीन कोटी गुंतवणूकदारांनी कंपनीच्या सहकारी संस्थांकडे अडकलेल्या ८० हजार कोटी रुपयांचा परतावा मागितला आहे.
सहकार मंत्रालयाने गुंतवणूकदारांसाठी एक पोर्टल लाँच केले आहे जेथे ते सोसायट्यांमध्ये अडकलेले त्यांचे पैसे मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात, असे राज्यसभेत सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांनी एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
वर्मा म्हणाले की, पोर्टलवर तीन कोटी गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे ८० हजार कोटी रुपये परत मिळवण्यासाठी नोंदणी केली आहे. आम्ही ४५ दिवसांत गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आम्हाला ५ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी अधिक निधी सहारा समूहाकडून मिळवण्यासाठी आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ. सहारा समूहाच्या गुंतवणूकदारांचा प्रत्येक पैसा परत केला जाईल, असेही वर्मा यांनी सभागृहाला सांगितले. आम्ही लहान गुंतवणूकदारांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या रकमेसह प्रथम पैसे परत करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.