आता रामराज्य आणू या! सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन

अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर उपस्थितांसमोर भागवत बोलत होते.
आता रामराज्य आणू या! सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन

अयोध्या : आज अयोध्येत प्रभू श्रीरामांसोबत भारताचे स्वत्व परतले आहे. राम मंदिर उभारले, आता रामराज्यही आणू या, असे आवाहन असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी केले. अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर उपस्थितांसमोर भागवत बोलत होते.

मोहन भागवत म्हणाले, ‘‘संपूर्ण जगाला येणाऱ्या संकटातून दिलासा देण्याचे काम भारत करणार आहे. पंतप्रधानांनी येथे अयोध्येत प्राणप्रतिष्ठेला येण्यापूर्वी कठोर तपश्चर्या केल्याचे आज आपण ऐकले. तपश्चर्येपेक्षा जास्त कठोर तपश्चर्या त्यांनी केली. मोदी कठोर तपस्वी आहेत. रामराज्यात सत्य, करुणा, सेवा, परोपकार होता. आजचा कार्यक्रम नवीन भारताचे प्रतिनिधित्व आहे. राम मंदिर तयार झालेय, आता रामराज्याची निर्मिती करावी. रामराज्य आणणं हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.’’

वाद संपवून समन्वयाने चालावे लागेल

भागवत म्हणाले, ‘‘प्रभू श्रीराम अयोध्येत आले आहेत. अयोध्येतून बाहेर का गेले होते? रामायण काळात असे का घडले? प्रभू राम १४ वर्षे वनवासात गेले होते. संसारातील कलह संपवून परत आले आहेत. आज पाचशे वर्षांनंतर रामलल्ला पुन्हा आले आहेत. जेथे कोणताही संघर्ष, कलह आणि अडचण नाही, अशी ही अयोध्या नगरी आहे. चांगले वर्तन ठेवण्यासाठी तपश्चर्या करावी लागते. आपल्याला सर्व मतभेदांना देखील निरोप द्यावा लागेल. लहानमोठे मतभेद, छोटे छोटे वाद होतात. त्यावरून भांडण्याची सवय सोडावी लागेल. सत्य म्हणते, सर्व घटक राम आहेत. समन्वयाने वाटचाल करावी लागेल,’’ असे आवाहनही भागवत यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in