स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केवळ इंग्रजांनाच मदत केली नाही, तर बापूंच्या हत्येसाठी त्यांनी गोडसेला बंदूक पुरवली, असा गंभीर आरोप महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गांधी विरुद्ध सावरकर असा वाद उफाळण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली, असा आरोप केला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असतानाच आता या वादात तुषार गांधी यांनी ट्विट करून उडी घेतली आहे.
तुषार गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सावरकरांनी केवळ इंग्रजांनाच मदत केली नाही, तर बापूंच्या हत्येसाठी नथुराम गोडसेला एक चांगली बंदूक पुरवली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधीपर्यंत गोडसेकडे हत्या करण्यासाठी शस्त्र नव्हते, असे त्यांनी म्हटले आहे.