"जोपर्यंत पोलीस, मेळा प्रशासन येऊन माफी मागत नाही..."; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद उपोषणावर

माघ मेळ्यात शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी त्यांची पालखी म्हणजेच रथयात्रा रविवारी थांबविल्याच्या निषेधार्थ त्याच ठिकाणी सुरू केलेले धरणे आंदोलन २४ तासांपासून सुरूच आहे. पोलिसांनी जिथे त्यांना सोडले होते त्याच ठिकाणी आपल्या मंडपात रात्रभर थंडीत ते धरणे धरून बसले असून त्यांनी अन्न ग्रहण केलेले नाही. तसेच पाणीही सोडले आहे.
"जोपर्यंत पोलीस, मेळा प्रशासन येऊन माफी मागत नाही..."; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद उपोषणावर
Photo : X
Published on

प्रयागराज : माघ मेळ्यात शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी त्यांची पालखी म्हणजेच रथयात्रा रविवारी थांबविल्याच्या निषेधार्थ त्याच ठिकाणी सुरू केलेले धरणे आंदोलन २४ तासांपासून सुरूच आहे. पोलिसांनी जिथे त्यांना सोडले होते त्याच ठिकाणी आपल्या मंडपात रात्रभर थंडीत ते धरणे धरून बसले असून त्यांनी अन्न ग्रहण केलेले नाही. तसेच पाणीही सोडले आहे.

पोलिस प्रशासनाने सन्मान, प्रोटोकॉलसह घेऊन जावे

शंकराचार्यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘जोपर्यंत मेळा प्रशासन आणि पोलीस येऊन माफी मागत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या आश्रमात प्रवेश करणार नाही. आम्ही फुटपाथवरच राहू.‘ इतिहासात शंकराचार्य जेव्हाही स्नानासाठी गेले आहेत, तेव्हा ते पालखीतूनच गेले आहेत. दरवर्षी ते याच पालखीतून जात आले आहेत. जोपर्यंत पोलिस प्रशासन सन्मान आणि प्रोटोकॉलसह घेऊन जात नाहीत, तोपर्यंत मी गंगास्नान करणार नाही. त्यांनी असेही सांगितले की, मी प्रतिज्ञा करतो की, मी प्रत्येक मेळ्यासाठी प्रयागराजला येईन, पण कधीही शिबिरात राहणार नाही. मी फुटपाथवरच माझी व्यवस्था करेन. यापूर्वी माध्यम प्रभारी शैलेंद्र योगीराज यांनी सांगितले की, शंकराचार्यांनी कालपासून काहीही खाल्लेले नाही. कोणताही प्रशासकीय अधिकारी त्यांना भेटायलाही आला नाही. सकाळी त्यांनी आपली पूजा आणि दंड तर्पण त्याच ठिकाणी केले.

शंकराचार्यांचे गंभीर आरोप

शंकराचार्यांनी माध्यमांशी बोलताना आरोप केला की, पोलिसांनी मुद्दाम चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. काही पोलीस अधिकारी गणवेशात नव्हते आणि आपल्याशी गैरवर्तन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दोषी अधिकाऱ्यांनी सन्मानपूर्वक संगमापर्यंत सोबत नेईपर्यंत आपण स्नान करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मौनी अमावस्येनिमित्त शंकराचार्यांच्या रथयात्रेदरम्यान झालेल्या गोंधळाचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आले आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेडिंग लावले होते. याचदरम्यान, शंकराचार्यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.

logo
marathi.freepressjournal.in