नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाची निशाणी आणि पक्ष अजित पवारांच्या फुटीर गटाला दिल्यामुळे धक्का बसलेले राष्ट्रवादी पक्ष संस्थापक शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
शरद पवार यांनी रविवारी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना निवडणूक आयोगाने पक्षाच्या संस्थापकाकडून पक्ष हिसकावून इतरांच्या हाती दिला, देशात या आधी असे कधीच घडले नव्हते, असे म्हटले होते. शरद पवार यांनी १९९९ साली काँग्रेसमधून फुटून
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. शरद पवार गटाने याआधी निवडणूक आयोगाकडे नाव बदलण्याची विनंती केली होती. त्यात आपल्या गटाला ‘शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी, शरद स्वाभिमानी’ अशी पर्यायी नावे तसेच वटवृक्ष, चहाचा कप, सूर्यफूल आणि उगवता सूर्य अशा पर्यायी निशाण्यांपैकी एखादी मिळावी, अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली होती.