

नवी दिल्ली : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील ‘अँटिलिया’ या बहुमजली निवासस्थानाजवळ २०२१ मध्ये सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि त्यानंतर व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात माजी पोलीस अधिकारी प्रदीप रामेश्वर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे.
या प्रकरणातून दोषमुक्त करण्यासाठी शर्मा यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. उच्च न्यायालयाने यापूर्वीच त्यांचा हा अर्ज फेटाळला होता, त्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे.
न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने शर्मा यांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना स्पष्ट केले की, न्यायालय या टप्प्यावर जामीन किंवा अटकपूर्व जामीन यावर विचार करू शकते, परंतु या गुन्ह्यातील गांभीर्य पाहता सध्याच्या परिस्थितीत दोषमुक्ततेचा (केसधून नाव वगळण्याचा) आदेश दिला जाऊ शकत नाही.