
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन झालेल्या अटल सेतूला जोडणाऱ्या रोडला भेगा पडल्याचं समोर आलं होतं. आता राम मंदिरालाही पहिल्याच पावसात गळती सुरु झाल्याचा दावा काल रामलल्लांचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटानं एक्स (पूर्वीचे ट्विटर) पोस्टच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर मोदी सरकारवर टीका केली आहे. 'पहिल्याच पावसाने केला मोदींच्या गॅरंटीचा पर्दाफाश!' असं या पोस्टमध्ये शिवसेना ठाकरे गटानं म्हटलं आहे. विकासाच्या नावाखाली मोदी सरकारने वाट लावली, अशी टीकाही ठाकरे गटानं केली आहे.
शिवसेना ठाकरे गटानं व्हिडिओत काय म्हटलंय?
पहिल्याच पावसाने केला मोदींच्या गॅरंटीचा पर्दाफाश!
राम मंदिराला गळती,
अटल सेतूला भेगा,
कोस्टल रोडला गळती,
कशेडी बोगद्याला गळती,
निवडणुकींसाठी घाईघाईनं घातला उद्धाटनांचा घाट
विकासाच्या नावाखाली मोदी सरकारने लावली वाट
कॅप्शनही तितकंच बोलकं?
हा व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये शिवसेना ठाकरे गटानं म्हटलं आहे की, "पहिल्याच पावसाने केला मोदींच्या गॅरंटीचा पर्दाफाश निवडणुकीमुळे मोदींना पूर्ण न झालेल्या कामांच्या उदघाटनांची एवढी घाई लागली होती की, त्या घाईचे परिणाम आता जनतेला भोगावे लागतायत. विकासाच्या नावाखाली फक्त जनतेचा पैसा उधळला गेला, पण पुढे निष्पन्न काहीच झालं नाही."