
बंगळुरू : ‘पाकिस्तानसोबत युद्धाची गरज नाही’, असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केल्यानंतर त्याचे पडसाद थेट पाकिस्तानात उमटले आहेत. पाकिस्तानी वर्तमानपत्रांनी त्यांचे विधान उचलून धरल्यानंतर भारतात त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. विशेष करून भाजपने सिद्धरामय्या यांना धारेवर धरले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले होते की, युद्धाची गरज नाही. अपरिहार्य असल्यास युद्ध व्हावे. युद्धामुळे कोणत्याही प्रश्नावर तोडगा निघू शकत नाही. पहलगाममध्ये पर्यटकांना सुरक्षा देणे ही केंद्राची जबाबदारी होती. यात त्रुटी राहिल्या, तसेच गुप्तचर यंत्रणांचा निष्काळजीपणा नडला, असे वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्याला पाकिस्तानी मीडियाने उचलून धरले. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
सिद्धरामय्या यांची सारवासारव
त्यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, मी पाकिस्तानसोबत युद्ध नको असे म्हटले नाही, तर युद्ध हा कोणत्याही प्रश्नावर तोडगा नाही, असे मी म्हणालो.