नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीची पुढील आणि निर्णायक बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. त्यापूर्वीच इंडिया आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह दिसत आहेत. काँग्रेस पक्षाने बुघवारी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील ७ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. यानंतर दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी ७ जागा लढवणार असल्याचे जाहीर केले, त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. आप पक्षाने यावर तीव्र प्रतिक्रिया देतांना याचा निर्णय आता इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकित होर्इल असे म्हटले आहे. नवी दिल्लीच्या सरकारमध्ये मंत्री असलेले आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी अशा गोष्टी समोर येत राहतील, ज्यावेळी इंडिया आघाडीच्या पक्षांचे नेते एकत्र येतील त्यावेळी वरिष्ठ नेतृत्त्व जागा वाटपावर चर्चा करेल, असे म्हटले. तसेच कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील ते त्यावेळी कळेल, असे सौरभ भारद्वाज म्हणाले.