खामेनींच्या हत्येबाबत दिल्लीचे मौन आश्चर्यकारक! सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येबाबत सरकारचे मौन आश्चर्यकारक असून ही तटस्थता नाही तर कर्तव्यात कुचराई आहे. यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत आणि विश्वासार्हतेवर गंभीर शंका उपस्थित होत आहेत, असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
खामेनींच्या हत्येबाबत दिल्लीचे मौन आश्चर्यकारक! सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका
Published on

नवी दिल्ली : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येबाबत सरकारचे मौन आश्चर्यकारक असून ही तटस्थता नाही तर कर्तव्यात कुचराई आहे. यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत आणि विश्वासार्हतेवर गंभीर शंका उपस्थित होत आहेत, असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

इराणवर अमेरिका आणि इस्रायलकडून झालेल्या हल्ल्यावरूनही सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला परराष्ट्र धोरणाची आठवण करून दिली आहे.

अमेरिका आणि इस्रायलने हवाई हल्ले करून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली खामेनी यांची हत्या केली. सोनिया गांधी यांनी एका माध्यमात लेख लिहून मोदी सरकारवर यावरून टीका केली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय परिस्थिती बिघडली असताना सरकारच्या त्रासदायक मौनावर विनाविलंब स्पष्ट आणि खुली चर्चा व्हावी, अशी अपेक्षा सोनिया गांधींनी व्यक्त केली.

एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या लेखात सोनिया गांधींनी म्हटले आहे की, आपल्याला तातडीने नैतिक सामर्थ्य पुन्हा शोधण्याचे आणि ते स्पष्टपणे आणि वचनबद्धतेने सांगण्याची गरज आहे. सरकारचे मौन तितकेच धक्कादायक आहे. खामेनींची हत्या आणि इराणी सार्वभौमत्वावर हल्ला झाला. मात्र, मोदींनी यूएईवर इराणच्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्याचा निषेध करण्यापुरते स्वत:ला मर्यादित ठेवले.

...तेव्हा परराष्ट्र धोरणाबाबत गंभीर शंका निर्माण होते

आपल्या देशाकडून सार्वभौमत्वाचे किंवा आंतरराष्ट्रीय कायद्याचे खुलेपणाने संरक्षण करण्यात आले नाही. मात्र, एखाद्या विदेशातील नेत्याची हत्या केल्यानंतर निष्पक्षपणा सोडला जातो, तेव्हा आपल्या परराष्ट्र धोरणाबाबत आणि विश्वासार्हतेबद्दल गंभीर शंका निर्माण होते, असेही सोनिया यांनी म्हटले आहे.

राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूचे समर्थन करता का - राहुल गांधी

इराण प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडावे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही म्हटले आहे. मोदी यांनी बोलले पाहिजे, राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूचे समर्थन ते करतात का, याचेही उत्तर दिले पाहिजे, असे राहुल यांनी म्हटले आहे. भारताने नैतिकदृष्ट्या स्पष्ट असले पाहिजे, आंतरराष्ट्रीय कायदा आणि मानवी जीवनाच्या रक्षणासाठी बोलण्याचे धाडस आपल्याकडे असले पाहिजे, मौन बाळगल्याने जगात भारताची प्रतिमा मलिन होत आहे, असे राहुल यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in