आज (१८ सप्टेंबर) रोजी संसदेचं विशेष अधिवेशन सुरु होत असून हे अधिवेशन संसदेच्या नवीन इमारतीमध्ये भरवण्यात येणार आहे. संसदेत दाखल होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले की, "आपल्या भारताचा तिरंगा चंद्रावर अभिमानाने फडकत आहे. भारताची चांद्रमोहीम यशस्वी पार पडल्याने जगभरात भारताचा सन्मान अधिक वाढलाय. तसंच आपण 'जी २० परिषद' देखील यशस्वी करुन दाखवल्याने भारताचा प्रत्येक ठिकाणी गौरव होत आहे.
पंतप्रधान पुढे म्हटले की, "भारताच्या उज्ज्वल भविष्याचा काळ सुरु झाला आहे. काल (१७ सप्टेंबर) विश्वकर्मा जयंती होती. देशातल्या विश्वकर्मा समूदायाचा जो परंपरागत व्यवसाय आहे. तो त्यांना आधुनिक पद्धतीने करता यावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. देशामध्ये आता उत्सवाचं वातावरण आहे, देशात नवीन आत्मविश्वास आपण अनुभव करत आहोत." संसदेच्या विशेष सत्राबद्दल बोलताना मोदी म्हणाले, "सत्र छोटे आहे पण वेळेच्या अनुषंगाने मोठे निर्णय होणार आहेत. हे आता ऐतिहासिक निर्णयाचं सत्र असून नवे संकल्प, नवी ऊर्जा, नवा विश्वास या सत्रातून मिळणार आहे. त्यामुळे आता नेहमीची रडारड सोडून दयावी आणि अधिवेशनात जास्तीत जास्त आपला वेळ द्यावा", असा सल्ला देखील त्यांनी विरोधकांना दिला आहे.
ते पुढे म्हणाले की, "वाईटपणा सोडून आता चांगुलपणा धरत नवीन संसद भवनामध्ये प्रवेश करणं महत्त्वाचं आहे. उद्या गणेश चतुर्थीचं शुभ पर्व सुरु होत असून. भरताच्या स्वप्नांना आता नव्याने बळ मिळेल", असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.