
नवी दिल्ली रेल्वे स्थानकरावर शनिवारी (दि १५) रात्री १० च्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १८ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेविषयी रेल्वेस्थानकावरील हमाल आणि प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार शेवटच्या क्षणी गाडीचा प्लॅटफॉर्म बदलल्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. तर उत्तर रेल्वेचे सीपीआरओ यांनी या दाव्यांचे खंडन केले आहे. तसेच या सर्व अफवा आहेत, असे म्हटले आहे.
'एएनआय' वृत्तसंस्थेने शनिवारच्या दुर्घटनेविषयी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील एका हमालाचा बाईट सोशल मीडियावर शेअर केला आहे. या हमालाने म्हटले की, ''शनिवारी रात्री नवी दिल्ली स्थानकावर प्रचंड गर्दी होती. मी गेल्या अनेक वर्षांपासून येथे काम करत आहे. मात्र, इतक्या वर्षात मी पहिल्यांदाच अशी गर्दी पाहिली. प्रयागराजला जाणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक १२ वरून जाणार होती. मात्र, नंतर ही रेल्वे १२ ऐवजी १६ नंबर प्लॅटफॉर्मवरून निघेल, अशी घोषणा करण्यात आली. त्यामुळे १२ नंबरवर थांबलेले प्रवासी एकदम १६ नंबरकडे वळाले. तर १६ नंबर प्लॅटफॉर्मवरील प्रवासी देखील वळाले. प्रचंड गर्दीमुळे स्वयंचलित जिन्याजवळ अनेक जण पडले आणि दुर्घटना घडली. आवाज ऐकूण आम्ही हमाल मदतीसाठी धावलो. पोलीस, रुग्णवाहिका यांची मदत पोहोचण्यापूर्वी आम्ही मदतकार्य सुरू केले. या भयावह घटनेमुळे रात्री जेवणाची देखील इच्छा झाली नाही,'' असे या हमालाने म्हटले आहे. तसेच त्याने १५ मृतदेह बाहेर काढल्याचा दावाही केला आहे.
तर अन्य काही प्रत्यक्षदर्शींनी देखील शेवटच्या क्षणी प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा केल्यामुळे प्रवाशांच्या धावपळी दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला. नंतर उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशू उपाध्याय यांनी या सर्व दाव्यांचे खंडन केले आहे. तसेच या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी वृत्तसंस्था 'आयएएनएस' आणि माध्यमांशी बोलताना अफवांवर विश्वास ठेवू नका, असे सांगितले.
ते म्हणाले, "मी स्पष्ट करू इच्छितो की काल कोणत्याही नियोजित ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलला गेला नाही किंवा रद्द करण्यात आला नाही. या फक्त अफवा आहेत. तथापि, कुठे चुका झाल्या याचे मूल्यांकन करण्यासाठी, एक उच्चस्तरीय समिती चौकशी करत आहे आणि लवकरच त्याचा अहवाल सादर करेल," असे त्यांनी 'आयएएनएस'ला सांगितले.