पुरीमध्ये भगवान जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू, अनेक भाविक जखमी

Jagannath Rath Yatra: ओदिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथाच्या भव्य रथयात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका भाविकाचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.
पुरीमध्ये भगवान जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू, अनेक भाविक जखमी
Published on

पुरी : ओदिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथाच्या भव्य रथयात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका भाविकाचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. पुरीतील बारादांडा येथे ही घटना घडली असून काही जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. या घटनेनंतर गर्दीवर नियंत्रण मिळवून आणखी अनुचित घटना घडू नये, याची काळजी घेतली जात आहे.

ओदिशातील प्रसिद्ध जगन्नाथ पुरी येथे रविवारी भव्य जगन्नाथ रथयात्रा निघाली. भगवान बलभद्र यांचा रथ ओढत असताना चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात एक जण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्रचंड उष्णता, रथयात्रेसाठी लोटलेला अफाट जनसागर आणि श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्यामुळे रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने आपत्कालीन सेवा सुरू करत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

ओदिशातील जगन्नाथ रथयात्रा जगभरात प्रसिद्ध असून तिला ऐतिहासिक विशेष महत्त्वही आहे. ही रथयात्रा काढून भगवान जगन्नाथांना प्रसिद्ध गुंडीचा माता मंदिरात नेले जाते. १२ व्या शतकापासून सुरू झालेल्या या यात्रेत हजारो, लाखो भाविक एकत्र येतात.

पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी त्यांच्या शिष्यांसह भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथांचे दर्शन घेतले. यानंतर पुरीच्या राजाने ‘छेरा पहानारा’ (रथ साफ करणे) विधी पार पाडला आणि सायंकाळी ५.२० वाजताच्या सुमारास रथ ओढण्याची प्रक्रिया सुरू झाली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन मांझी यांनीदेखील रथांचे दर्शन घेतले. सुमारे १० लाख भाविक रथयात्रेत सहभागी झाले होते.

logo
marathi.freepressjournal.in