मालदा : पश्चिम बंगालमध्ये मालदा येथे भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. बुधवारी दुपारी मालदाच्या हरिश्चंद्रपूर परिसरात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पोहोचली, असता, त्यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा आरोप काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही घटना बिहारमध्ये घडल्याचा दावा केला आहे.
गाडीवर दगडफेक झाल्यानंतर राहुल गांधी खाली उतरले. त्या गाडीमध्ये काँग्रेस नेते अधीर रंजनही उपस्थित होते. कारच्या मागची काच तुटली असून राहुल गांधींना मात्र कोणतीही दुखापत झालेली नाही.
काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी या घटनेनंतर बंगाल सरकारवर आरोप केला आहे. ते म्हणाले की, “ज्यावेळी राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाली, त्यावेळी आम्ही कारमध्येच होतो. मागून वीट कोण फेकत आहे ते मला दिसले नाही. मात्र पश्चिम बंगालमध्ये प्रत्येक पावलावर राहुल गांधी यांना रोखले जात आहे. पश्चिम बंगालमध्ये न्याय यात्रेने प्रवेश केल्यापासून अडचणींचा सामना करावा लागत आहे.”
कट रचला जातोय -अधीर रंजन
‘‘भारत जोडो न्याय यात्रेला जितका विरोध व्हायचा तितका झालाय, याची सुरुवात कूचबिहारपासून झाली. राज्यात विविध जिल्ह्यात सरकारी कामासाठी प्रशासकीय अधिकारी गेस्ट हाऊसमध्ये राहिले आहेत. त्यामुळे तृणमूल सरकारकडून राहुल गांधींच्या न्याय यात्रेला गेस्ट हाऊस अथवा स्टेडियम उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे. या यात्रेला बंगाल सरकारचा पाठिंबा नाही. मुर्शिदाबाद जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर राहुल गांधी ज्या स्टेडियमवर रात्री मुक्कामी थांबणार होते, त्याचीही परवानगी मिळाली नाही. आतापर्यंत घडलेल्या घटनेवरून कट रचला जातोय, असे वाटतेय,” असे अधीर रंजन म्हणाले.