विद्यार्थी आंदोलनादरम्यान हल्ला प्रकरण : स्वतंत्र भारद्वाजला अखेर अटक; दिल्ली पोलिसांची कारवाई

विद्यार्थी चळवळीशी संबंधित एका कार्यकर्त्याच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर स्वतंत्र भारद्वाज याला दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून ताब्यात घेतले.
विद्यार्थी आंदोलनादरम्यान हल्ला प्रकरण : स्वतंत्र भारद्वाजला अखेर अटक; दिल्ली पोलिसांची कारवाई
विद्यार्थी आंदोलनादरम्यान हल्ला प्रकरण : स्वतंत्र भारद्वाजला अखेर अटक; दिल्ली पोलिसांची कारवाई
Published on

नवी दिल्ली : विद्यार्थी चळवळीशी संबंधित एका कार्यकर्त्याच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर स्वतंत्र भारद्वाज याला दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून ताब्यात घेतले.

'कॉकरोच जनता पार्टी'च्या कार्यकर्त्यांनी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यासमोर केलेल्या तीव्र आंदोलनानंतर पोलिसांनी ७२ तासांच्या आत अटकेचे आश्वासन दिले होते, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. स्वतःला 'कट्टर हिंदू' म्हणवून घेणाऱ्या स्वतंत्र भारद्वाजचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. २० जुलै रोजी दिल्लीत झालेल्या एका आंदोलनादरम्यान विद्यार्थी कार्यकर्ते निशू आझाद यांचे वडील संजय कुमार यांचे डोके फोडल्याचा दावा तो या व्हिडिओमध्ये उघडपणे करताना दिसत होता.

तुकड्या तैनात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या अनेक तुकड्या भारद्वाजच्या शोधात तैनात करण्यात आल्या होत्या. पोलीस पथक पकडण्यासाठी पोहोचण्यापूर्वीच भारद्वाजने आपली ओळख लपवण्यासाठी हेल्मेट घालून 'बुलेट' दुचाकीवरून नैथला गावातून खुर्जाच्या दिशेने पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी माग काढून अखेर त्याला बुलंदशहर येथून ताब्यात घेतले.

पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याबाहेर 'कॉकरोच जनता पार्टी'ने गुरुवारी आणि शुक्रवारी तीव्र निदर्शने केली. सीजेपीचे सह-संयोजक सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी आरोप केला की, पोलिसांनी राजकीय दबावाखाली आरोपीवर सौम्य कारवाई केली. आंदोलकांच्या मागणीनुसार आता पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा प्रयत्न (कलम ३०७), गुन्हेगारी धमकी आणि अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कलमे वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.

खासदार चंद्रशेखर आझाद यांनीही पोलीस प्रशासनावर निशाणा साधला. आरोपी उघडपणे टीव्हीवर येऊन गुन्ह्याची कबुली देतो, तरीही पोलीस त्याला केवळ नोटीस देऊन सोडून देतात. आरोपी पीडित कुटुंबाला धमकावत असून देशातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहे, असा घणाघात आझाद यांनी केला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in