‘इंडिया’ आघाडीची अखेर?

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी बनवलेली ‘इंडिया’ आघाडी संपल्याचे संकेत मिळत आहेत.
‘इंडिया’ आघाडीची अखेर?
Published on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी बनवलेली ‘इंडिया’ आघाडी संपल्याचे संकेत मिळत आहेत. राजद नेते तेजस्वी यादव यांच्यानंतर काँग्रेस नेते नेता पवन खेरा यांनीही ही आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीपुरतीच मर्यादित असल्याचे सांगितले.

‘इंडिया’ आघाडीबाबत विचारलेल्या प्रश्नावर खेरा म्हणाले की, ही आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीपुरतीच होती. ती राष्ट्रीय स्तरावर होती. प्रत्येक राज्यातील परिस्थितीनुसार, प्रत्येक घटक पक्ष एकत्रित की वेगवेगळे होऊन निवडणूक लढवायची याचा निर्णय घेतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

राजद नेते तेजस्वी यादव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘इंडिया’ आघाडी संपली आहे. ही आघाडी केवळ लोकसभेसाठी होती. निवडणूक संपल्यानंतर ती संपली आहे.

इंडिया आघाडी मजबूत - पायलट

मुंबई : इंडिया आघाडीच्या भवितव्याबाबत देशपातळीवरील राजकारणात चर्चेला उधाण आलेले असतानाच इंडिया आघाडी मजबूत असल्याचा दावा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी गुरुवारी येथे केला.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील पक्षानी 'आप'ला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. तृणमूल काँग्रेस आणि सपानंतर आता शिवसेनेनेही (उबाठा) ‘आप’ला पाठिंबा जाहीर केला असल्याने इंडिया आघाडीच्या भवितव्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत सचिन पायलट म्हणाले की, लोकशाही, संविधान व देशहित लक्षात घेऊन काँग्रेससह अनेक पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे, ही आघाडी आजही मजबूत आहे. प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगळी असते. त्यानुसार काही निर्णय घ्यावे लागतात याचा अर्थ इंडिया आघाडी कमजोर झाली असे म्हणता येणार नाही, असे सचिन पायलट यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in