नवी दिल्ली : तुरडाळीचे दर देशात २०० रुपये किलोच्या वर गेल्याने सर्वसामान्य माणसांचे हाल होत आहेत. त्यातच निवडणुका जवळ आल्याने सरकारने तूरडाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार ४ लाख टन तूरडाळ जानेवारीत, तर १० लाख टन उडीद डाळ फेब्रुवारीत मान्यमारमधून आयात करणार आहे, अशी माहिती केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत डाळींचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डाळींचा तुटवडा निर्माण होण्याचा अंदाज आहे.
ऑक्टोबरमध्ये तूरडाळीचे दर (४०.९४ टक्के), मूगडाळीचे दर (१२.७५ टक्के), चणाडाळीचे (११.१६ टक्के) दर वाढले आहेत, तर डाळींची किरकोळ महागाई १८.७९ टक्क्याने वाढली. तुरीचा महागाईवाढीचा दर ३७.३ टक्के आहे. तुरीचे दर कमी होण्यासाठी सरकारने आफ्रिका व म्यानमारमधून डाळ आयात करण्याचे ठरवले आहे.