चेन्नई : राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात मतभेदाची अनेक प्रकरणे आतापर्यंत समोर आली आहेत. मात्र तामिळनाडू विधानसभेत सोमवारी जे घडले ते आतापर्यंत कधीही घडले नव्हते. राज्यपाल आर.एन. रवी यांनी राज्य सरकारने तयार केलेला अभिभाषण वाचण्यास नकार देत विधानसभेतून बाहेर पडले.
भारताच्या संसदीय इतिहासातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. जेव्हा राज्यपालांनी अभिभाषण वाचले नाही आणि सभात्याग केला. मात्र त्यानंतरही द्रमुक सरकारने लिखित भाषणाच्या बाजूने ठराव संमत केला, जो राज्यपालांनी वाचलाही नव्हता.
सोमवारी विधानसभा सत्राची सुरुवात तामिळनाडूच्या राज्यगीताने झाली. यानंतर राज्यपाल आर.एन. रवी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि तमिळ तत्त्वज्ञ थिरुवल्लुवर यांच्या काही ओळी वाचल्या. यानंतर ते म्हणाले की, मी वारंवार विनंती करूनही अधिवेशनाच्या सुरुवातीला आणि शेवटी राष्ट्रगीत वाजवले जात नाही. असे केल्याने राष्ट्रगीताच्या प्रति आदर दिसून येतो. याशिवाय ते म्हणाले की, या अभिभाषण असे अनेक परिच्छेद आहेत, ज्यांनी मी समाधानी नाही. नैतिक आणि वस्तुस्थितीच्या आधारावर मी यावर समाधानी नाही, नसल्याचं ते म्हणाले आहेत.
राज्यपाल रवी म्हणाले की, मी माझे भाषण संपवतो. सभागृहाचे कामकाज चालावे आणि लोकांच्या हितासाठी चांगली चर्चा व्हावी, अशी माझी इच्छा आहे. असे बोलून राज्यपाल यांनी आपले भाषण थांबवले. त्यानंतर तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष ए. अप्पावू यांनी भाषणाचा तामिळ अनुवाद वाचून दाखवला. यावेळी राज्यपाल सभापतींच्या शेजारी बसले होते. हे अभिभाषण मंजुरीसाठी राजभवनाकडे पाठवल्याचे सांगून सभापतींनी भाषण संपवले. राष्ट्रगीताबाबतचा वादही मिटला असल्याचे ते म्हणाले. सभागृहाचे कामकाज राज्यगीताने सुरू करावे आणि शेवटी राष्ट्रगीत वाचावे, असे आम्ही आधीच ठरवले आहे, असेही ए. अप्पावू म्हणाले.
याशिवाय सभापती म्हणाले की, वैचारिक मतभेद असले तरी तामिळनाडूच्या एम.के. स्टॅलिन सरकारने राज्यपालांचा नेहमीच आदर केला आहे. आपल्या वागण्यात कोणताही बदल होणार नाही. आता प्रामाणिकपणा दाखवण्याची वेळ राज्यपालांची आहे. केंद्र सरकारकडे तामिळनाडूला वाटा देण्याची मागणी करा. पीएम केअर फंडात कोट्यवधी रुपये पडून आहेत. तुम्ही मागणी केली असती तर सरकारला दिलासा मिळाला असता आणि थोडीफार मदत मिळाली असती, म्हणजे पुरामुळे आलेल्या आपत्तीला तोंड देता आले असे, असे सभापती म्हणाले.