मणिपूरमधील घटना नक्कीच लज्जास्पद

देशाविरोधात कारवाई करणाऱ्यावर आम्ही कारवाई केली असे अमित शहा यांनी संसदेत म्हटले आहे
मणिपूरमधील घटना नक्कीच लज्जास्पद

नवी दिल्ली: मणिपूरमधील हिंसा आणि एकंदर घटना लज्जास्पद आहेच, पण त्यावर राजकारण करणे हे त्याहून लज्जास्पद सांगत अमित शहा यांनी विरोधकांवर तोफ डागली, सरकार हे मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चेस तयार आहे, पण विरोधकांना ही चर्चा व्हायला नको आहे. विरोधकच चर्चा होऊ देत नाहीत, असा आरोपही अमित शहा यांनी केला. तर यावेळी गेल्या सहा वर्षांत मोदी सरकारने मणिपूरमध्ये केलेल्या कामांविषयी देखील माहिती दिली आहे.

मोदी सरकारवर मणिपूर हिंसाप्रकरणी अविश्वास ठराव आणलेल्या विरोधकांच्या चर्चेला उत्तर देतांना गृहमंत्री अमित शहा यांनी या अविश्वास प्रस्तावावर कोणालाच विश्वास नसल्याचे सांगून जनता सर्व पाहात आहे, जनतेला सर्व समजते. हा ठराव जनतेमध्ये केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणून आणण्यात आला आहे, असे म्हणत अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

ते म्हणाले की, जनतेमध्ये केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करत असून त्यासाठी हा अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. जनतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. दोन वेळा आम्ही बहुमताने निवडून आलो आहोत, असे म्हणत अमित शहा यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय पंतप्रधान असल्याचे अनेक अहवालातून स्पष्ट झाल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. सरकारने त्यांच्या नऊ वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून, पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार आणि घराणेशाही हटवली, असे अमित शहा म्हणाले आहेत. अविश्वासाचा प्रस्ताव जेव्हा तुम्ही घेऊन येता तेव्हा तुम्ही सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते, त्यामुळे याबाबत सरकारची बाजू मांडणे गरजेचे आहे, म्हणून मी इथे उभा आहेट, असे त्यांनी म्हटले आहे. तर या अविश्वास प्रस्तावावर कोणालाच विश्वास नसल्याचे म्हणत अमित शहा यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. पुढे बोलतांना त्यांनी म्हटले आहे की, जनता सर्व बघत आहे त्यांना सर्व माहित आहे त्यामुळे त्यांच्यात संभ्रम निर्माण करण्याची गरज नाही. अमित शाह पुढे म्हणाले की, अविश्वास प्रस्तावाला आमचा कोणताही आक्षेप नाही. पण आपले स्वत:चे सरकार वाचवण्यासाठी भ्रष्टाचार करणे हे युपीएचे वैशिष्टये आहे. पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार छोडो भारत, राजवंश छोडो भारत आणि तुष्टीकरण छोडो भारत'चा नारा दिला आहे. सत्तेचे रक्षण करणे हे युपीएचे काम आहे, असे म्हणत अमित शाह यांनी काँग्रेसवरुन निशाणा साधला आहे.

तुमचा नाही पण जनतेचा पूर्ण विश्वास आहे

फक्त तुमचाच सरकारवर अविश्वास आहे, देशाच्या जनतेचा सरकावर पूर्ण विश्वास आहे, असे म्हणत अमित शहा यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले. तर या अविश्वासाच्या प्रस्तावाला काही अर्थ नसल्याचे म्हणत त्यांनी सरकारच्या कामाचा पाढा वाचला. मोदी सरकारच्या काळात काश्मिरमधील दहशतवाद संपवण्यांचे काम आम्ही केले आहे. पीएफयावर आम्ही बंदी घातली. काश्मिरमधील दलित आदिवासींना आम्ही आरक्षण दिले. तर देशाविरोधात कारवाई करणाऱ्यावर आम्ही कारवाई केली असे अमित शहा यांनी संसदेत म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in