अपहृत इराणी जहाजाची भारतीय नौदलाकडून सुटका; २३ पाकिस्तानी कर्मचारी मुक्त
नवी दिल्ली : एडनच्या आखाताजवळ समुद्री चाच्यांनी अपहरण केलेल्या इराणी मासेमारी जहाजाची आणि त्यावरील २३ पाकिस्तानी कर्मचाऱ्यांची भारतीय नौदलाने सुटका केली आहे.हिंदी महासागराच्या वायव्येकडे, एडनच्या आखाताजवळ वसलेल्या सोकोत्रा द्वीपसमूहाच्या परिसरात ‘एफव्ही एल कंबार’ नावाचे इराणी जहाज मासेमारी करत होते. त्यावर पाकिस्तानचे २३ कर्मचारी होते. या जहाजाचे नऊ सागरी चाच्यांनी अपहरण केले होते.
त्याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर भारतीय नौदलाने बचाव मोहीम हाती घेतली. अपहृत जहाजाचा शोध घेऊन त्याचा १२ तासांहून अधिक काळ पाठलाग करण्यात आला. शुक्रवारी पहाटे भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस सुमेधा’ या युद्धनौकेने अपहृत जहाजाला रोखले. थोड्याच वेळात ‘आयएनएस त्रिशूळ’ ही क्षेपणास्त्रधारी फ्रिगेटही तेथे दाखल झाली. या दोन्ही युद्धनौकांवरील नौसैनिकांनी अपहृत जहाजाची आणि त्यावरील २३ पाकिस्तानी कर्मचाऱ्यांची सुटका केली. त्यावेळी नऊ सागरी चाचे शरण आले.