"या घटनेत राजभवनाचाही हात होता", अटकेबाबत हेमंत सोरेन यांचा गंभीर आरोप

"...आम्ही अजून पराभव स्वीकारलेला नाही. जर त्यांना वाटत असेल की ते मला तुरुंगात टाकून यशस्वी होऊ शकतात, तर हे झारखंड आहे जिथे..."
"या घटनेत राजभवनाचाही हात होता", अटकेबाबत हेमंत सोरेन यांचा गंभीर आरोप

झारखंडमधील राजकीय गदारोळानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ईडीने सोरेने यांच्यावर अटकेची कारवाई केली, पुढे झामुमोचे नेते चंपाई सोरेन यांच्यावर विश्वास दाखवत पक्षाने त्यांच्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली. आज(५ फेब्रुवारी) चंपाई सोरेन सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागत असून यापूर्वी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राजभवनावर गंभीर आरोप केला आहे. "३१ जानेवारीच्या रात्री देशात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. मला विश्वास आहे की, या घटनेत राजभवनाचाही हात होता", असा गंभीर आरोप सोरेन यांनी केला.

आम्ही अजून पराभव स्वीकारलेला नाही-

"...आम्ही अजून पराभव स्वीकारलेला नाही. जर त्यांना वाटत असेल की ते मला तुरुंगात टाकून यशस्वी होऊ शकतात, तर हे झारखंड आहे जिथे अनेकांनी आपले प्राण दिले आहेत...", असेही हेमंत सोरेन म्हणाले.

...तर मी राजकारणातून संन्यास घेईन-

''मला ८.५ एकर जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. जर तुमच्यात हिंमत असेल तर माझ्या नावावरील जमिनीचे कागदपत्र दाखवावेत. जर घोटाळा सिद्ध झाला तर मी राजकारणातून संन्यास घेईन'' असे आव्हान सोरेन यांनी दिले.

हेमंत सोरेन यांच्यावर झालेला अन्याय संपूर्ण देशाने बघितला आहे. हेमंत यांनी राज्यात केलेले काम मोठे आहे. प्रत्येक घरात त्यांच्या योजनांचा लाभ पोहोचलेला आहे, असे झारखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चंपाई सोरेन बहुमत चाचणीआधी विधानसभेला संबोधित करताना म्हणाले.

काय आहे मतांचे गणित?

झारखंड विधानसभेत एकूण ८१ सदस्य आहेत. यात बहुमतासाठी ४१ आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे. झामुमोच्या नेतृत्वाखालील युतीकडे ४८ आमदाराचे बहुमत आहे. यात झामुमोचे २९, काँग्रेसचे १७, आरजेडी आणि सीपीआय(ML) यांच्या प्रत्येकी एक सदस्यांचा समावेश आहे. एनडीएकडे २९ आमदार असून यातील एकट्या भाजपाकडे भाजपकडे २६, AJSU कडे ३, तर उर्वरित ३ आमदार अपक्ष आणि इतरांचे आहेत.

logo
marathi.freepressjournal.in