केमोथेरपीत कर्करोग रुग्णांवर होणारे दुष्परिणाम कमी करणारी ‘केमो स्ट्रॅटेजी’ आयआयटी गुवाहाटीने विकसित केली आहे. या पद्धतीत कर्करोग रुग्णाच्या बाधित पेशीत थेट केमोथेरपीचे औषध टाकले जाते. त्यामुळे रुग्णांवर या औषधाचे दुष्परिणाम होत नाहीत.
आयआयटी गुवाहाटीच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रा. देबाशिष मन्ना यांनी सांगितले की, कर्करोगग्रस्त पेशींना नेस्तनाबूत करणारे केमोथेरपी औषध निर्माण करणे हे आमच्यासमोर मोठे आव्हान होते. कारण केमोथेरपीची औषधे कर्करूग्णांच्या पेशीसोबतच चांगल्या पेशींनाही इजा करतात. केमोथेरपीच्या दुष्परिणामामुळेच अनेक कर्करोग रुग्णांचा मृत्यू होतो ही वस्तुस्थिती आहे, असे ते म्हणाले.
मन्ना यांच्यासोबतच सुभाशिष डे, अंजली पटेल, बिश्व मोहन प्रुस्टी आदींनी या संशोधनात सहभाग घेतला आहे. हे संशोधन ‘द रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’ ‘केमिकल कम्युनिकेशन्स’, ‘ऑर्गेनिक ॲँड बायोमॉलिक्यूलर केमिस्ट्री’ आदी प्रतिष्ठीत जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले. आयआयटी गुवाहाटीच्या अंदाजानुसार, भारतात २०२५ पर्यंत ३ कोटी हून अधिक कर्करोग रुग्ण असतील.
असे काम करते औषध
आयआयटी गुवाहाटीच्या संशोधकांनी विशेष रेणू विकसित केले आहेत. औषधांसोबत हे विशेष रेणू कॅप्सूलमध्ये साचवले जातात. हे कॅप्सूल केवळ कर्करूग्णांच्या पेशीवर हल्ला करतात. या नवीन औषधांमुळे केमोथेरपीचे दुष्परिणाम कमी होतात, असा दावा या संशोधकांनी केला.