
नवी दिल्ली : निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राऐवजी (ईव्हीएम) पूर्वीप्रमाणेच मतपत्रिकांचा वापर करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
जेव्हा तुम्ही निवडणुकीत विजयी होता, तेव्हा ईव्हीएममध्ये फेरफार होत नाही, मात्र जेव्हा तुम्ही निवडणुकीत पराभूत होता तेव्हा ईव्हीएममध्ये फेरफार होतो, असा शेरा न्या. विक्रम नाथ आणि न्या. पी. बी. वैराळे यांच्या पीठाने मारला.
पूर्वीप्रमाणेच मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्यात यावे या मागणीसह याचिकेत इतरही मागण्या करण्यात आल्या होत्या. मतदारांना पैसे, मद्य आणि अन्य घटकांचे वाटप करताना उमेदवार पकडला गेला तर त्याला पाच वर्षांसाठी अपात्र ठरविण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावे, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली होती.
जेव्हा अर्जदार के. ए. पॉल यांनी आपण जनहित याचिका दाखल केल्याचे सांगितले. तेव्हा तुम्ही मनोरंजक याचिका केली आहे, अशी कल्पना तुम्हाला कशी सुचली, असा सवाल पीठाने केला. त्यानंतर पॉल म्हणाले की, तीन लाखांहून अधिक अर्भके आणि ४० लाखांहून अधिक विधवांची सुटका करणाऱ्या संघटनेचे आपण अध्यक्ष आहात. असे असताना तुम्ही राजकीय रिंगणात का उडी घेत आहात, तुमच्या कामाचे क्षेत्र वेगळे आहे, असे पीठाने म्हटले.