देशातील तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे केंद्र सरकारचे आश्वासन पुन्हा एकदा फोल ठरल्याचे समोर आले आहे. देशातील बेरोजगारीचा दर ऑगस्ट महिन्यामध्ये ८.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत रोजगार २० लाखांनी घटून तो ३९.४६ कोटींवर आला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये बेरोजगारीचा दर ६.८ टक्के होता, तर रोजगार ३९७ दशलक्ष इतका होता. सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास यांनी सांगितले की, “शहरी बेरोजगारीचा दर सामान्यतः ग्रामीण बेरोजगारीच्या दरापेक्षा जास्त आहे. यावेळी शहरी बेरोजगारीचे प्रमाण आठ टक्के, तर ग्रामीण बेरोजगारीचा दर सुमारे सात टक्के इतका झाला आहे.” भारताने ब्रिटनला मागे टाकून जगात पाचव्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. त्याच वेळी अर्थव्यवस्थेसमोर मंदी, बेरोजगारी, उद्योग-धंदे, कर्जदरातील वाढ अशी अनेक संकटे देशासमोर उभी राहिली. ऑगस्टमध्ये, शहरातील बेरोजगारीचा दर ९.६ टक्क्यांवर गेला आहे. तर ग्रामीण बेरोजगारीचा दर ७.७ टक्क्यांवर गेला आहे.