चालू महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत शहरी भागातील बेरोजगारीचा दर ९.३५ टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑगस्ट २०२१ नंतरचा हा उच्चांक आहे. त्यावेळी बेरोजगारीचा दर ९.७८ टक्के होता. या महिन्यात गावांमधील बेरोजगारीचा दर ७.१८ टक्के आहे. मात्र, जूनमध्ये तो ८.०३ टक्के आणि जुलैमध्ये ६.१४ टक्के होता.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील बेरोजगारीचा दर ऑगस्ट २०२१मध्ये ८.३२ टक्क्यांवर होता आणि त्यानंतर या वर्षी फेब्रुवारीमध्ये पुन्हा आठ टक्क्यांवर गेला. त्यावेळी खेड्यातील बेरोजगारीचा दरही आठ टक्क्यांच्या पुढे जात गेल्या वर्षभरातील सर्वोच्च पातळीवर होता. गेल्या वर्षभरातील सर्वात कमी बेरोजगारीचा दर या वर्षी जानेवारीमध्ये होता.
२५ जुलैपासून शहरांमध्ये आठ टक्क्यांवर दर
यावर्षी २५जुलैपासून शहरी भागातील बेरोजगारीचा दर दररोज ८ टक्क्यांवर आहे. गेल्या २१ दिवसांत तो एकाही दिवशी कमी झालेला नाही. १६ ऑगस्ट रोजी तो ९.४४ टक्क्यांवर गेला. २७ जुलैपासून गावांमधील बेरोजगारीचा दर ६ टक्क्यांहून अधिक आहे. २४ जुलैपासून देशभरात त्यात सातत्याने वाढ होत आहे. १ ऑगस्ट रोजी त्यात थोडीशी घट झाली होती.
नरेगाअंतर्गत रोजगारामध्ये ४७ टक्के घट
जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये मनरेगाच्या रोजगारात ४७ टक्क्यांनी घट झाली आहे. आकडेवारीनुसार, जुलैमध्ये एकूण कामगारांची संख्या २२२ दशलक्ष प्रतिदिन होती, जी जूनमध्ये ४२२ दशलक्ष प्रतिदिन होती.