
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग स्थापन करण्यासाठी सध्या कोणतीही योजना नसल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली. आठवा वेतन आयोग स्थापन करण्यासंदर्भात एका खासदाराने विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना असा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे चौधरी यांनी लोकसभेत सांगितले. महागाईमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये निर्माण झालेली तूट भरून काढण्यासाठी या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात येतो. महागाईच्या दरानुसार प्रत्येक सहा महिन्यांनी महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात येत असल्याची माहिती चौधरी यांनी संसदेत दिली आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या अखिल भारतीय ग्राहक निर्देशांकानुसार हा भत्ता ठरवण्यात येत असल्याचे अर्थ राज्यमंत्र्यांनी संसदेत सांगितले.