

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अभ्यासक्रमात इयत्ता नववीपासून तिसरी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी तीव्र चिंता व्यक्त केली. यामुळे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण वाढेल, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने ही भाषा इयत्ता ५ वी किंवा ६ वीपासूनच सुरू करावी, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा ताण जाणवणार नाही, अशी सूचना केली आहे.
न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. आर. महादेवन यांच्या खंडपीठाने याबाबत केंद्र सरकारला तोंडी निर्देश दिले. नववीचे वर्ष आधीच अत्यंत तणावाचे असते आणि या ताणाची सुरुवात आठवीपासूनच होते, असे सांगून न्या. नागरत्ना यांनी न्यायालयाच्या या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले.
तामिळनाडूतील प्रत्येक जिल्ह्यात 'जवाहर नवोदय विद्यालय' स्थापन करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात तामिळनाडू सरकारने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.