गया (बिहार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटनेच्या मुद्द्यावरून मंगळवारी इंडिया आघाडीवर पुन्हा एकदा हल्ला चढविला. जे राज्यघटनेच्या विरोधात आहेत त्यांना धडा शिकविण्यासाठी आणि देशाला विकसित भारत बनविण्यासाठी केंद्र सरकार करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये खोडा घालणाऱ्यांविरोधात ही निवडणूक आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.
काँग्रेस आणि राजदसह अन्य विरोधी पक्षांचे नेते घटनेबाबत राजकारण करीत असल्याचा आरोपही मोदी यांनी केला. बिहारच्या गया जिल्ह्यातील एका निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. ही निवडणूक आघाडीच्या घमंडिया (उद्धट) नेत्यांना धडा शिकविण्यासाठी आहे, असे मोदी म्हणाले. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थान अवामी मोर्चाचे नेते जितनराम मांझी हे गया मतदारसंघातून रालोआचे उमेदवार आहेत.
आपल्याला दूषणे देण्यासाठी काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष घटनेचा आधार घेऊन खोटे बोलत आहेत. रालोआ घटनेचा आदरच करते, डॉ. बाबासाहेब आंबेडकरही आता घटना बदलू शकणार नाहीत, घटनेमुळेच आज आपण पंतप्रधान आहोत, विरोधी पक्षांचे नेते घटनादिन साजरा करण्याच्या विरोधात आहेत, असेही मोदी म्हणाले.
आमच्यासाठी घटना ही आस्था आहे, विरोधी पक्ष घटनेचे राजकारण करीत आहे, काँग्रेस आणि राजद सामाजिक न्यायाच्या नावाखाली राजकारण करीत आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले.