

मुंबई : मध्य-पूर्वेतील अडचणींच्या पार्श्वभूमीवर अलीकडील आठवड्यांत प्रवासाच्या पसंतीत लक्षणीय बदल झाल्याचे सोमवारी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातून समोर आले आहे. अधिकाधिक प्रवासी पर्यायी आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत ठिकाणांची निवड करत असून, या महिन्यात आशियाई देशांमध्ये बुकिंगमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे.
प्रवास सेवा देणाऱ्या ixigo या प्लॅटफॉर्मने सांगितले की, अलीकडच्या आठवड्यांत प्रवाशांच्या पसंतीत बदल होत असून, अधिक लोक पर्यायी आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांसह देशांतर्गत सहलींना प्राधान्य देत आहेत.
ixigo चा हा अहवाल या महिन्याच्या सुरुवातीपासून प्लॅटफॉर्मवर झालेल्या विमान बुकिंगवर आधारित असून, त्याची तुलना मागील वर्षातील याच कालावधीतील आकडेवारीशी करण्यात आली आहे.
याशिवाय, देशांतर्गत पर्यटनालाही चांगली चालना मिळत असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. उदयपूर येथे विमान बुकिंगमध्ये ६९ टक्के वार्षिक वाढ झाली असून, त्यानंतर जोधपूर (४७ टक्के), बागडोगरा (४४ टक्के), श्रीनगर (४१ टक्के) आणि अगरतळा (३८ टक्के) यांचा क्रम लागतो.
“वर्षाच्या या काळात मध्यपूर्व हा भारतीय प्रवाशांसाठी पारंपरिकदृष्ट्या प्रमुख आंतरराष्ट्रीय पर्याय राहिला आहे. मात्र, अलीकडील आठवड्यांत बदलत्या जागतिक परिस्थितीमुळे प्रवासाच्या पसंती अधिक विविध बाजारपेठांकडे वळताना दिसत आहे. विशेषतः जवळच्या दक्षिण-पूर्व आशियाई देशांकडे झुकाव वाढत असून, विमान बुकिंगमध्ये लक्षणीय वाढ होत आहे,” असे ixigo चे सह-संस्थापक आणि समूह मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक बाजपेयी यांनी सांगितले.
अहवालानुसार, मध्यपूर्वेतील उड्डाणांमध्ये व्यत्यय आणि हवाई क्षेत्रातील मर्यादा यांसारख्या बदलत्या जागतिक परिस्थितीमुळे हा कल निर्माण झाला आहे. त्यामुळे पर्यटक अधिक परिचित आणि सहज पोहोचता येणाऱ्या ठिकाणांना प्राधान्य देत आहेत.
या महिन्यातील प्रवासासाठी आशियाई देशांमध्ये विमान बुकिंगमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आहे.
व्हिएतनाम हे १३० टक्के वार्षिक वाढीसह सर्वाधिक लोकप्रिय आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थान ठरले आहे, असे अहवालात नमूद केले आहे. यानंतर नेपाळ (८८ टक्के), श्रीलंका (६८ टक्के), इंडोनेशिया (३३ टक्के), सिंगापूर (३२ टक्के) आणि थायलंड (२२ टक्के) या देशांचा क्रम लागतो.