
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारत-पाकिस्तान युद्धाबाबत नवा दावा केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धादरम्यान दोन्ही देशांनी एकमेकांची सात लढाऊ विमाने पाडली होती, असे आता ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे दोन्ही देश अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर होते, मात्र ते युद्धही आपणच थांबविल्याचा पुनरुच्चारही ट्रम्प यांनी केला आहे.
विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह ट्रम्प यांनी आतापर्यंत ३० हून अधिक वेळा भारत-पाकिस्तान युद्ध रोखल्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हे श्रेय घेत असताना त्यांनी आतापर्यंत वेगवेगळे दावे गेले आहेत. बऱ्याचदा त्यांच्या दोन दाव्यांमध्ये तफावत आढळली आहे. त्यामुळे ट्रम्प खरे बोलत असतील का याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. ट्रम्प यांच्या वेगवेगळ्या दाव्यांमुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सात विमाने पाडली
आता ट्रम्प यांनी दावा केला आहे की त्यांनी आतापर्यंत सहा युद्धे रोखली आहेत. यामध्ये भारत-पाकिस्तान युद्धाचाही समावेश आहे. ते म्हणाले, हे युद्ध अणू युद्धात रुपांतरित होणार होते, परंतु, मी मध्यस्थी करून ते थांबवले. त्यांनी आधी एकमेकांची सात लढाऊ विमाने पाडली होती. युद्ध आणखी तीव्र होणार होते, असेही ते म्हणाले.
भारताने काय म्हटले
ट्रम्प यांच्या दाव्यांमधील विमानांची संख्या सातत्याने बदलत आहे. ते कधी दावा करतात पाच विमाने पाडली, कधी सहा विमाने पाडल्याचे वक्तव्य करतात, तर आता त्यांनी म्हटलं आहे की या युद्धात दोघांनी एकमेकांची सात विमाने पाडली आहेत. दरम्यान, भारतीय हवाई दलाने आपल्या अधिकृत निवेदनात पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने व एक एईडब्ल्यू ॲण्ड सी विमान पाडल्याची पुष्टी केली आहे. म्हणजेच विमानांची एकूण संख्या सहा होती.
त्रयस्थ सहभाग नव्हता
दरम्यान, ट्रम्प सातत्याने दावा करत आहेत की त्यांनी भारत-पाकिस्तान युद्ध रोखले. मात्र, भारताने प्रत्येक वेळी ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला आहे. भारताने म्हटले आहे की, दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बातचीत करून युद्धविरामाचा निर्णय घेतला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत स्पष्ट केले होते की, भारत-पाकिस्तान संघर्ष रोखण्यात कुठल्याही तिसऱ्या देशाचा सहभाग नव्हता. तो दोन देशांनी घेतलेला निर्णय होता.