"जम्मू-काश्मीरमध्ये तीन दिवसांत तीन दहशतवादी हल्ले, 'अबकी बार'वाले तिकडे..." उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका

सरकार तिसऱ्यांदा स्थापन केलं, इकडे तीन दिवसांत तीन हल्ले झाले. आता तरी मोदी तिकडे जाणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
"जम्मू-काश्मीरमध्ये तीन दिवसांत तीन दहशतवादी हल्ले, 'अबकी बार'वाले तिकडे..." उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका
Published on

मुंबई: लोकसभा निवडणूकांनंतर आता राज्यात 26 जून रोजी विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदान होत आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 22 मे रोजी उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख असणार आहे. आज मुंबईत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल परब यांचा संकल्पनामा प्रसिद्ध करण्यात आला. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांत तीन वेळा दहशतवादी हल्ले झाले, आता तरी तिकडे जाणार आहात की नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

सरकार तिसऱ्यांदा स्थापन केलं, तीन दिवसांत तीन हल्ले झाले...

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांत तीन दहशतवादी हल्ले झालेत. याविषयी बोलताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. ते म्हणाले की, "ही कुणाची जबाबदारी आहे? अबकी बारवाले कुठं गेले? तिथं वारंवार हल्ले होत आहेत, तरीही अबकी बारवाले तिथं जायला तयार नाहीत. काल परवा मोहन भागवत यांनी मणिपूर जळत असल्याचं सांगितलं. आता तरी ते तिकडे जाणार का? कलम ३७० हटवलं म्हणतात, पण काश्मीरमध्ये काय फरक पडला? लोकांचे जीव तर जातच आहेत. सरकार तिसऱ्यांदा स्थापन केलं, इकडे तीन दिवसांत तीन हल्ले झाले. आता तरी मोदी तिकडे जाणार का? की विरोधी पक्षांना संपवण्यातच आनंद मानतील? जबाबदारी त्यांची आहे. जर त्यांना ती सांभाळता येत नसेल, तर पुन्हा पंतप्रधान होण्याचा त्यांना काहीच हक्क नाही."

मला देशाच्या भविष्याची काळजी...

उद्धव ठाकरें पुढे म्हणाले की, "सरकारच्या भवितव्याशी मला काही देणं घेणं नाही, मला देशाचं भविष्याची काळजी आहे. ते ४०० पार करणार होते. ते 240 वर अडकले. आता मोदी सरकारचं एनडीए सरकार झालं."

logo
marathi.freepressjournal.in