सभेला खुर्च्या कमी, तरी तेच सरकारमध्ये; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

बिहार निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या यशामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या, त्यांचे सरकार आले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)
उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने २०२ जागांवर विजय मिळवला, तर महागठबंधनला फक्त ३५ जागा मिळाल्या. बिहार निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या यशामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या, त्यांचे सरकार आले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

आपले मुख्यमंत्री म्हणाले की जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनण्यामागचे रहस्य आजपर्यंत कोणी समजू शकलेले नाही. बिहारच्या निवडणुकीत जे जिंकले त्यांचे अभिनंदन. पण, एका गोष्टीचे मला आश्चर्य वाटते की, तेजस्वी यादव यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. मग तो प्रतिसाद खरा होता की ‘एआय’ने तयार केलेलीमाणसे होती, हे आता कळेना. म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते, त्यांचे सरकार न येता ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या असतात त्यांचे सरकार येते. या नवीन लोकशाहीतील हे गणित कळण्याच्या पलीकडचे आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

बिहारमध्ये महिलांना १० हजार रुपये देण्याच्या योजनेवर उद्धव ठाकरे म्हणाले की, “हा एक फॅक्टर झाला. याचा कदाचित काहीसा फरक पडलाही असेल. पण तेथील लोक ज्या समस्या भोगत आहेत, ते एवढ्या लवकर बदलतील असे वाटत नाही. भाजप प्रादेशिक पक्ष संपवायला निघाले आहेत. भाजपला राष्ट्रगीत शिकवले पाहिजे. अनेकतेत एकता आहे. ती एकता मारण्याचा प्रयत्न सुरू आहे”, असेही ते म्हणाले.

“बहुमत आल्यावरही त्यांना नेता निवडता येत नाही. महाराष्ट्रातही पाशवी मतदानानंतर (मागील निवडणुकीत) नेता निवडायला त्यांनी काही वेळ घेतला होता. दहा हजार रुपये दिल्यामुळे काही फरक पडला असेल, पण लोक रोज जे भोगत आहेत ते त्यांच्या मनातून अजून जात नाही,” अशी टीकाही त्यांनी केली.

बिहारमधील निकाल कळण्याच्या पलीकडचे

हे अनाकलनीय गणित आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादीतून ६५ लाख नावे वगळल्याचा मुद्दा आम्ही उचलला होता. ती परत घेतली की नाही माहीत नाही. आम्ही मोर्चा काढला. दुबार नोंदणी, बोगस पत्त्यावर आम्ही बोललो. पण निवडणूक आयोग काही बोलत नाही. ढिम्म आहे. त्यामुळे या प्रक्रियेला लोकशाही मानायची का? आमचा निवडणुकीला विरोध नाही. निवडणूक लोकशाहीचा जीव आहे. पण असा प्रकार मानायचा का? निवडणूक आयोग काही उत्तर द्यायला तयार नाही,” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केला.

logo
marathi.freepressjournal.in