पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर १ ऑक्टोबरपासून मुंबई ते गुजरात अशी वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) सुरु करण्यात आली. मात्र, अनेकदा तिचा अपघात होत असल्याने चिंता वाढली आहे. गुरुवारी १ डिसेंबरला संध्याकाळी उदवाडा आणि वापी रेल्वेस्थानकदारम्यान वंदे भारत एक्स्प्रेस पुन्हा एकदा जनावरांना धडकली. असं अपघात होण्याची ही चौथी वेळ आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी माहिती दिली की, हा अपघात उदवाडा-वापी या रेल्वेस्थानकांदरम्यान घडला. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यामध्ये वंदे भारत एक्स्प्रेसच्या समोरच्या भागाचे चांगलेच नुकसान झालेले आहे. या घटनेनंतर काही कालावधीसाठी रेल्वे थांबवण्यात आली होती. याआधी ६ ऑक्टोबरलाही वटवा ते मनीनगर दरम्यान अपघात झाला होता.