

मुंबई : भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच, एका जिवंत मानवी हृदयाची मुंबई सेंट्रल - गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेसने सुरत ते अहमदाबाद दरम्यान यशस्वी वाहतूक करण्यात आली. यामुळे वेळेच्या मर्यादेत हृदय प्रत्यारोपणाची महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया करणे शक्य झाले. या ऐतिहासिक कामगिरीने ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचा वेग आणि भारतीय रेल्वे, पश्चिम रेल्वे, रेल्वे सुरक्षा बल, गुजरात पोलीस व वैद्यकीय पथकांमधील उत्तम समन्वय अधोरेखित केला आहे.
हे हृदय ट्रेन क्रमांक २०९०१ द्वारे सुरक्षितपणे अहमदाबादला पोहोचवण्यात आले. तेथील फलाट क्रमांक १ वरून विशेष तयार करण्यात आलेल्या ‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे ते ‘यू. एन. मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटर’ येथे नेण्यात आले. या समन्वित प्रयत्नांमुळे हे अवयव कोणताही विलंब न होता रुग्णालयात पोहोचले, ज्यामुळे डॉक्टरांना वेळेवर जीवनरक्षक प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे शक्य झाले.
अहमदाबादचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक वेद प्रकाश यांनी सांगितले की, ही मोहीम भारतीय रेल्वेसाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. या जीवनरक्षक मोहिमांमध्ये प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. वंदे भारतच्या माध्यमातून जिवंत मानवी हृदयाची यशस्वी वाहतूक ही भारतीय रेल्वे, आरपीएफ, गुजरात पोलीस आणि वैद्यकीय पथकांच्या उत्कृष्ट समन्वयामुळेच शक्य झाली. मानवी जीव वाचवणे हे केवळ आमचे कर्तव्य नसून आमची सर्वोच्च जबाबदारी आहे,’ असे ते म्हणाले.
ही कामगिरी आणीबाणीच्या आरोग्य सेवेसाठी रेल्वे पायाभूत सुविधांच्या वापरातील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. आपल्या वेग आणि वेळेच्या पाळणुकीसाठी ओळखली जाणारी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस वेळेचे बंधन असलेल्या अवयवांची लांब अंतरावर वाहतूक करण्यासाठी एक प्रभावी माध्यम सिद्ध झाली आहे. रेल्वे अधिकारी, सुरक्षा कर्मचारी, ट्रान्सप्लांट समन्वयक आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे एकत्र आलेले प्रयत्न कसे जीव वाचवू शकतात, हे या मोहिमेने दाखवून दिले आहे.
रेल्वे विश्वासू साथीदार बनली
प्रवासी आणि मालाची वाहतूक करण्यापलीकडे, भारतीय रेल्वे आता गंभीर वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी एक विश्वासू साथीदार म्हणून वेगाने पुढे येत आहे.