

नवी दिल्ली : बांगलादेशात हिंदू युवकाची जमावाने हत्या केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद मंगळवारी दिल्लीत उमटले. विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हातात भगवे झेंडे घेत घोषणाबाजी करीत बांगलादेशच्या उच्चायुक्तालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. यावेळी निदर्शकांनी सुरक्षा दलांचे संरक्षणकडेही तोडले. तेव्हा कार्यकर्ते आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली.
विहिंपने निदर्शने करण्याचे ठरविल्याने उच्चायुक्तलयाबाहेर सकाळपासूनच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरक्षा दलांनी सात पदरी कडे घातले होते आणि पोलीस व निमलष्करी दलाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणाव तैनात करण्यात आले होते. उच्चायुक्तालयापासून ८०० मीटर अंतरावरच निदर्शकांना रोखण्यात आले.
भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते. हिंदू रक्त की एक-एक बंदू का हिसाब चाहिये, अशा आशयाचे फलक काही निदर्शकांच्या हातात होते. बांगलादेशातील मायमनसिंग जिल्ह्यात दीपू दास या युवकाची ईश्वरनिंदा केल्याबद्दल जमावाने हत्या केली होती आणि त्याचे पार्थिव झाडाला बांधून ते पेटविण्यात आले होते. दीपू चंद्राच्या हत्येप्रकरणी बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने सुरू करण्यात आली असून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी करत सकाळी ११ वाजल्यापासून कार्यकर्ते बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर जमले. दरम्यान, बांगलादेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या, विशेषतः वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढत आहे.
उच्चायुक्तांना पाचारण
दरम्यान, बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले आहे. भारतीय उच्चायुक्तांना बोलावण्याची आठवडाभरातील ही दुसरी वेळ आहे. बांगलादेशी विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर आणि त्यानंतर दीपू यांच्या जमावाने केलेल्या मारहाणीनंतर झालेल्या भारतविरोधी निदर्शनांमुळे दोन्ही देशांमधील संबंध लक्षणीयरीत्या बिघडले आहेत. भारताचे उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना मंगळवारी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाचारण केले आणि भारतातील बांगलादेशच्या उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली.