मणिपूर पुन्हा पेटले

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा मणिपूरमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाला.
मणिपूर पुन्हा पेटले

इम्फाळ : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा मणिपूरमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाला. मणिपूरच्या जिरिबाम जिल्ह्यात संशयित अतिरेक्यांनी एका पोलीस चौकीला आग लावली असून अनेक घरेही पेटवून दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अतिरेक्यांनी एका व्यक्तीची हत्या केल्यानंतर हिंसाचाराचा उद्रेक झाला. बराक नदीच्या तीरावर असलेल्या छोटोबेकरा परिसरातील जिरी पोलीस चौकीला दहशतवाद्यांनी आग लावली. बंदूकधारी संशयित डोंगराळ भागातील अतिरेकी असून त्यांनी अंधाराचा फायदा घेत लामताई खुनोऊ, मोधुपूर परिसरातील अनेक घरांना आगी लावल्या. अतिरेक्यांविरुद्धच्या मोहिमेत सहकार्य करण्यासाठी मणिपूर पोलिसांच्या कमांडोंना हवाई मार्गाने जिरिबाम येथे आणण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, जिरिबाम जिल्ह्यातील २३९ महिला आणि लहान मुलांना त्यांच्या गावातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. जिरिबाम जिल्ह्यात मैतेई, कुकी, मुस्लिम, नागा आणि बिगर मणिपुरी अशी वांशिक विविधता असून या जिल्ह्यास आतापर्यंत हिंसाचाराची झळ बसली नव्हती. इम्फाळ खोऱ्यातील मैतेई आणि डोंगराळ भागातील कुकी यांच्यातील वांशिक संघर्षामुळे आतापर्यंत २०० हून अधिक बळी गेले असून हजारो लोक बेघर झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in