प. बंगालमधील मनरेगा कर्मचाऱ्यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पैसे, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची घोषणा

पश्चिम बंगालमधील मनरेगा कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत २१ फेब्रुवारीपर्यंत थकित पैसे जमा करण्यात येतील, अशी घोषणा राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी केली.
प. बंगालमधील मनरेगा कर्मचाऱ्यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पैसे, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची घोषणा

कोलकाता : पश्चिम बंगालमधील मनरेगा कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत २१ फेब्रुवारीपर्यंत थकित पैसे जमा करण्यात येतील, अशी घोषणा राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी केली.

राज्यातील २१ लाख मनरेगा कर्मचाऱ्यांनी योजनेच्या नियमांनुसार दरवर्षी किमान १०० दिवस काम केले आहे. तरीही गेल्या तीन वर्षांपासून त्यांना त्याचा ठरलेला मोबदला मिळालेला नाही. केंद्र सरकारने राज्यातील विविध जनकल्याण योजनांसाठीचा निधी तीन वर्षांपासून दिलेला नाही. हा निधी तातडीने देण्यात यावा, यासाठी ममता बॅनर्जी यांनी कोलकाता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शुक्रवारपासून ४८ तासांचे धरणे आंदोलन सुरू केले आहे.

शनिवारी ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले की, त्यांचे सरकार केंद्राकडून निधी येण्याची वाट पाहणार नाही. आम्हाला भारतीय जनता पक्षासमोर भीक मागायची नाही किंवा आम्हाला त्यांच्याकडून खैरातही नको आहे. राज्य सरकार २१ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील २१ लाख मनरेगा कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थकित रक्कम जमा करेल, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसला ४० जागाही मिळणार नाहीत

आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरात काँग्रेसला ४० जागाही जिंकता येणार नाहीत, अशी टीका प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. देशात जेथे भाजप प्रमुख विरोधी पक्ष आहे, अशा ३०० मतदारसंघांत काँग्रेसने निवडणूक लढवावी, असे मी त्यांना प्रस्तावित केले होते. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आता राहुल गांधी मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी राज्यात यात्रा करत आहे. पण, देशात ३०० जागा लढवल्या तर ४० जागांवरही काँग्रेसचा विजय होणार नाही, असे ममता यांनी म्हटले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in