
अहमदाबाद : आम्ही दलित, मुस्लिम, ब्राह्मण समाजात अडकून पडलो आणि ओबीसी आमची साथ सोडून निघून गेले, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे केले.
साबरमती येथे काँग्रेस कार्यकारी समितीच्या अधिवेशनात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे १७०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, आम्ही मुस्लिमांबाबत बोलतो म्हणून आम्हाला मुस्लिमसमर्थक म्हटले जाते. पण, आपल्याला या वक्तव्यांमुळे घाबरता कामा नये. हे मुद्दे आपण उचललेच पाहिजेत.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार संघाच्या विचारांच्यापेक्षा वेगळे आहेत. तरीही ते त्यांच्या विचारावर दावा करत आहेत. संघाचा स्वातंत्र्य चळवळीत कोणताही सहभाग नव्हता. भाजप व संघ परिवार गांधीजींशी संबंधित संस्थांवर आता कब्जा करत आहेत.
पी. चिदंबरम पडले बेशुद्ध
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम हे या अधिवेशनात अचानक बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी चिदंबरम यांना तातडीने उचलून नेत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उष्णता आणि डिहायड्रेशनमुळे चिदंबरम यांना चक्कर आल्याचे सांगण्यात आले.