विशेष अधिवेशनाचा नेमका अजेंडा काय? सोनिया गांधींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा आधीच जारी केला जातो आणि असा अजेंडा जारी न होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.
विशेष अधिवेशनाचा नेमका अजेंडा काय? सोनिया गांधींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

केंद्र सरकारने या महिन्यात बोलवलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या अधिवेशनात सरकार कोणते विधेयक मांडणार आहे. तसंच कोणत्या महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे. याबाबत अद्याप कोणताही खुलासा केंद्राने केलेला नाही. राजकीय वर्तुळात मात्र याविषयी तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अशात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाचा नेमका अजेंडा काय ? कोणत्याही चर्चेविना विशेष अधिवेशन का जाहीर करण्यात आलं, असे सवाल केले आहेत.

सोनिया गांधी यांनी या पत्रात संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा आधीच जारी केला जातो आणि असा अजेंडा जारी न होण्याची ही पहिलीच वेळ आहे, ही बाब दुर्देवी आहे, असं मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी एक बैठक पार पडली. या बैठकीत अधिवेशनात विरोधक कोणते मुद्दे उपस्थित करणार आहेत, याबाबत चर्चा करण्यात आली. बुधवारी काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, काँग्रेस संसदीय पक्षाचा गट इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी झाला होता. विरोधी पक्ष संसदेच्या विशेष अधिवेशनात सभागृहावर बहिष्कार घालणार असून जनतेचे प्रश्न मांडणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून काही प्रश्न केले असल्याचं सांगितलं.

नेमकं सोनिया गांधींनी पत्र लिहून मोदींना काय म्हटलंय

काँग्रेस नेते सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात अधिवेशनात कोणते मुद्दे मांडायचे आहेत, याचा देखील उल्लेख केला आहे. तसंच विरोधकांनी मांडलेल्या मुद्यांवर चर्चा व्हावी, अशी मागणी देखील त्यांनी केली. संसदेच्या विशेष अधिवेशनात केवळ सरकारच्या अजेंड्यावर चर्चा होऊ नये. असं सोनिया गांधी यांनी म्हटलं. आहे. केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान सभागृहाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे.

logo
marathi.freepressjournal.in