
राज्यात ठिकठिकाणी सुरु असणाऱ्या पावसाचा सर्वाधिक फटका वाशी एपीएमसी मार्केटमधील भाज्यांसोबत फळांना देखील बसला आहे. एपीएमसी बाजारात येणाऱ्या हंगामी फळांचे यामुळे सर्वाधिक नुकसान झाले असून सीताफळ, डाळींबाचे उत्पादन कमी झाले आहे. यामुळे एपीएमसी बाजारात होणारी आवक देखील घटली आहे. परिणामी फळांच्या दरात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे.
नवी मुंबईतील वाशी एपीएमसी फळ बाजारात जुलै अखेर डाळिंब, सीताफळ हंगामाला सुरुवात होत असते. तर ऑगस्ट महिन्यात या फळाची आवक वाढण्यास सुरुवात होते. यासोबत डाळींब, सीताफळ या फळांची आवक देखील मोठ्या प्रमाणात सुरू होते. मात्र राज्यात ठिकठिकाणी सुरु असणाऱ्या पावसामुळे मागील काही दिवसांपासून एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होणाऱ्या भाजीपाला, कांदे-बटाटे, फळांच्या उत्पादनावर, पुरवठ्यावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे फळांची आवक घटल्याने फळांच्या दरात १५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती फळ व्यापारी सुदेश हांडे यांनी दिली. दरम्यान, बाजारात सध्या सिताफळाची १० ते १२ गाडी आवक असून आधी २०ते २५ गाड्या येत होत्या. तर डाळींबाच्या आधी १५ ते २० गाड्या, तर आता ७ ते ८ गाडी दाखल होत आहेत.
वसई केळींच्या दराने गाठला उच्चांक
वाशी एपीएमसी फळ बाजारात सध्या वसई केळीची मागणी वाढली आहे. वातावरणातील बदलामुळे या केळींना सर्वाधिक मागणी येत आहे. परंतु वसई केळीचा मुख्य हंगाम हा दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबर मध्ये सुरू होतो. त्यामुळे आता बाजारात वेलची केळीची आवक तुरळक होत असून पावसामुळे केळीच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. एपीएमसी बाजारात दररोज ९ ते १० टन केळींची आवक होते. परंतु मागील २ दिवसांपासून ही आवक घटली असून सध्या बाजारात दररोज २ ते ३ टन केळी दाखल होत आहेत. घाऊक बाजारात ४० ते ५० रुपये प्रति किलो दराने ही केळी उपलब्ध आहेत तर किरकोळ बाजारात प्रति डझन ८० ते १०० रुपये तर १२० ते १३० रुपये प्रति किलोने या केळींची विक्री होत असल्याची माहिती हांडे यांनी दिली.