

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील प्रादेशिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवणारा ऐरोली-काटई नाका कॉरिडॉर प्रकल्पाने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यातील ऐरोली ते ठाणे-बेलापूर रोड या उन्नत मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. तर या प्रकल्पातील ठाणे-बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग-४ या टप्पा-१ चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. तसेच तिसऱ्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत(एमएमआरडी) ऐरोली-काटई नाका कॉरिडॉर प्रकल्प राबविण्यात येत आहे. तीन टप्प्यात या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे ऐरोली, मुंब्रा आणि काटई नाका यांना अखंड रस्त्याने जोडणी मिळणार असून प्रवासाचे अंतर लक्षणीयरित्या कमी होणार आहे. सद्यस्थितीत रस्त्यांवरील गर्दी कमी होऊन नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि बदलापूर दरम्यान जलद व कार्यक्षम प्रवास शक्य होणार आहे.
हा कॉरिडॉर केवळ रस्ते प्रकल्प नसून महाराष्ट्राच्या भविष्यासाठीची धोरणात्मक गुंतवणूक आहे. टप्पा-१ आणि टप्पा-२ पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात असून वाहतुकीसाठी यावर्षीच सुरू करण्यात येतील.
प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार
ऐरोली-काटई नाका कॉरिडॉरमुळे मुंबई महानगर प्रदेशातील प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार आहे. प्रमुख शहरी केंद्रांना जोडणारा हा हायस्पीड मार्ग नागरिकांसाठी तसेच मालवाहतुकीसाठी अधिक कार्यक्षम आणि सुलभ ठरेल, असे एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले.
प्रवासाचा वेळ ३५ मिनिटांनी कमी होणार
ठाणे आणि नवी मुंबईसाठी हा प्रकल्प मोठा कनेक्टिव्हिटी बूस्टर ठरणार आहे. विशेषतः बोगद्यामुळे दोन्ही भागांदरम्यान अधिक जलद व अखंड प्रवास शक्य होईल. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ ३५ ते ४० मिनिटांनी कमी होणार असल्याचे उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले.