उरणमध्ये भावना घाणेकर यांचा दणदणीत विजय

उरण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून भाजपचे आमदार महेश बालदी यांना राजकीय पराभव स्वीकारावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
उरणमध्ये भावना घाणेकर यांचा दणदणीत विजय
Published on

उरण : उरण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून भाजपचे आमदार महेश बालदी यांना राजकीय पराभव स्वीकारावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर यांना ९,२१० मते मिळाली, तर भाजपच्या उमेदवार शोभा कोळी यांना ७,७४० मते मिळाली. भावना घाणेकर यांनी १,४७० मतांच्या फरकाने विजय संपादन केला.

या निवडणुकीत महाविकास आघाडीचे ९ उमेदवार नगरसेवकपदी निवडून आले असून भाजपचे १२ उमेदवार नगरसेवकपदी निवडून आल्याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. उद्धव कदम यांनी केली. अनपेक्षित निकालामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माझा विजय हा उरणकरांचा विजय आहे. त्यांच्या प्रेमाची व विश्वासाची मी कायम ऋणी राहीन. महाविकास आघाडीतील सर्व नेते व कार्यकर्त्यांनी एकदिलाने आणि जोमाने काम केल्यामुळे हा विजय शक्य झाला. यशामुळे मी कधीही उतणार नाही, मातणार नाही.

भावना घाणेकर , नवनिर्वाचित नगराध्यक्ष

‘गड आला पण सिंह गेला’

मागील २०१६ च्या निवडणुकीत उरण नगरपरिषदेत भाजपकडे नगराध्यक्षपदासह १३ नगरसेवक होते, तर शिवसेनेकडे ५ नगरसेवक होते. २०२५ च्या निवडणुकीत मात्र भाजपकडे नगरसेवक संख्या वाढली असली तरी नगराध्यक्षपद गमवावे 'गड आला पण सिंह गेला' अशी राजकीय चर्चा रंगली आहे.

प्लास्टिकच्या बादल्या फोडून जल्लोष

उरण नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या विजयानंतर शहरात जल्लोषाला उधाण आले आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आनंदोत्सव साजरा करत फटाके फोडले, घोषणा दिल्या तसेच प्लास्टिकच्या बादल्या फोडून जल्लोष केला. या प्रकारामुळे भाजप आमदार महेश बालदी यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा शहरात सुरू आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली. काही ठिकाणी प्लास्टिकच्या बादल्या फोडून अनोख्या पद्धतीने जल्लोष करण्यात आला. या प्रकारामुळे काही काळ शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिस प्रशासनाने वेळीच परिस्थिती हाताळत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली. सुदैवाने या घटनेत कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

logo
marathi.freepressjournal.in